बेळगाव—खानापूर : तालुक्यातील बेकवाड आणि भुत्तेवाडी येथे शॉर्टसर्किटने आग लागल्याने ऊस, आंबा आणि काजूची झाडे जळाल्याने 2 लाखाचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. तालुक्यातील बेकवाड येथे जकाप्पा भरमाणी बाळेकुंद्री यांच्या उसाच्या शेतातून विद्युतवाहिन्या गेल्या आहेत. बुधवारी दुपारी 4 वाजता खांब्यावर शॉर्टसर्किट झाल्याने ऊस पिकांत ठिणगी पडल्याने उसाने पेट घेतला.
यात दोन ट्रक ऊस पूर्णपणे जळून खाक झाला असून बाजूला असलेल्या आंबा, काजूच्या बागेतही या आगीची झळ पोहोचल्याने 1 एकरातील आंबा व काजूची झाडे पूर्णपणे जळून खाक झाल्याने जकाप्पा यांचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे.
तसेच तालुक्यातील भुत्तेवाडी येथील शेतकरी लक्ष्मण नारायण पाटील यांच्या शेतात शॉर्टसर्किटने ठिणगी पडल्याने त्यांचा दोन ट्रक ऊस आगीच्या भक्षस्थानी पडला आहे. त्यामुळे त्यांचेही जवळपास पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे. वारंवार शॉर्टसर्किटने आगीच्या घटना घडत असल्याने याबाबत हेस्कॉमकडून योग्य खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे.